Friday, September 01, 2006

मातृभाषा

माझी मातृभाषा मराठी हे सांगताना आज अनेकांना लाज वाटते. मला मराठी येत नाही हे सांगण्यात काय भूषण हे मला आजपर्यंत तरी नाही कळाले.
आज देशात-परदेशात अनेक संस्था आणि मायबोली , मनोगत यासारख्या संकेतस्थळांनी त्यांच्या कार्यातुन मराठी भाषा आणि संस्कॄती टिकवण्याचे नेटाने प्रयत्न करत आहेत हे खरोखरच आनंददायी आहे. साहित्यसंमेलनाच्या व्यासपिठावर उभेराहुन मराठी वर लंब्याचौड्या बाता मारण्यापेक्षातरी निश्चितच कौतुकास्पद आहे.

इथे अनेक जण त्यांचे blogs नियमितपणे मराठीत लिहितात ते पाहुन खुप बरे वाटते. माझ्याकडुन हा खारीचा वाटा.

माझ्या कचेरीमधे ( office मधे) काही चिनी वंशाचे लोक आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहीती मिळाल्यावर असे कळाले हि त्यांची इथे (अमेरिकेत) जन्मलेली तिसरी पिढी. इतके असुन पण सराईतपणे त्यांच्या भाषेत बोलतात, वाचतात आणि लिहितातही. ब‍र्याच वेळा त्यांच्या भाषेतले बारकावे, व्याकरणतील वैशिष्ठे पण समजावुन सांगतात. त्याच्या बरोबर उलटे 'आपली' माणसे. मराठी मंडळाचे काम करताना अनेक जण सतत इंग्लिश मधे बोलत असत्तात आणि वर अभिमानाने सांगतात की आमचे शिक्षण कॉन्व्हेंट मधे झाले ना म्हणुन बोलता येत नाही. लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालु केले त्यावेळी अनेक पालकांना हनुमानाची गोष्ट (मोठ्या अक्षरातील पुस्तकातली) न अडखळता वाचता पण नाही आली. आता आडात नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार? इथल्या स्थानिक शाळांमधुन दर शनिवारी इतर भाषेतले वर्ग असतात. मराठी भाषेसाठी पण आमच्या मंडळातील (इस्ट बे मराठी मंडळ डॉट ऑर्ग) काही लोक प्रयत्न करत आहेत पण दुर्दैवाने आपल्या लोकांकडुनच प्रतिसाद मिळत नाही तर बाकीच्यांकडुन काय अपेक्षा करावी.

मायबोली ह्या संकेतस्थळावरील 'हितगुज' ला नुकतीच दहा वर्षे पुर्ण झाली. मायबोलीचे जनक स्वतःच्या खिशातले पैसे पदरमोड करुन हा उपक्रम चालु ठेवत आहे त्याबद्दल समस्त मराठी भाषिक विशेषतः परदेशातील मराठी माणुस त्याचे शतशः आभारी आहे. हितगुजवर येवुन अनेक जण एकमेकांशी (मराठी मधुन) गप्पा मारतात, काही जण कथा कविता आदि साहित्यप्रकारांद्वारे भाषिकसंस्कृती समृद्ध ठेवत आहेत , त्यांचे ही कौतुकच आहे.

आज मराठी संस्कृतीबद्दल तावातावाने चर्चा चालतात, पण तुमची मातृभाषातुम्हीच नाही वापरत तर बाकी काय बोलायचे?

मराठी संस्कृतीबद्दल पुढच्या blog मधे ....

Sunday, March 26, 2006

श्री गणेशा !

नमस्कार मंडळी !

अनेक वेळा अनेक गोष्टी मनात येतात, काही घटनांबाबतचे मत कुठेतरी प्रकट करावे वाटते ... माझ्या काही मित्रांनी मला blog चा सल्ला दिला आणि गुगल ने मला ही 'देशमुखी' दिली , त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार !

समर्थांच्या 'दिसामाजी काहीतरी लिहित जावे' ह्या उक्ती प्रमाणे शक्य तितके लिहायचा विचार आहे.
तसा मी काही साहित्यिक, विचारवंत, कलाकार ह्या गटात येत नाही. पण बघु कितपत जमते ते ...